महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. तर आता दहावीचा निकाल केव्हा लागणार? असे प्रश्न विद्यार्थी, पालकांकडून उपस्थित केले जात आहेत.
यंदा कोरोनाचे सावट पसरले आहे. त्यामुळे शैक्षणिक क्षेत्रावर देखील याचा परिणाम झाला आहे. लॉकडाऊनच्या काळात बारावी आणि दहावी परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासणे, त्याचे संकलन करणे यासाठी बोर्डासमोर मोठे आव्हान होते. बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणे आणि संकलन करणे त्याचबरोबर सर्व कामे पार पाडून राज्यमंडळाने १६ जुलै रोजी ऑनलाईन पध्दतीने निकाल लावण्यात आला. यंदा कोरोनामुळे निकाल लागण्यास विलंब झाला. त्यात आता दहावी परीक्षेचा निकाल लागण्यास देखील विलंब झाला आहे. याशिवाय दहावी निकालाबाबत सोशल मीडियावर देखील विविध तारखा दोन महिन्यांपासून फिरविल्या जात आहे. यामुळे देखील संभ्रम निर्माण झाला आहे. बारावीचा निकाल तर लागला आता दहावी परीक्षेचा निकाल बोर्ड केव्हा जाहीर करणार आहे. याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहेत.
विद्यार्थ्यांनी अफवांवर विश्वास ठेवू नये
बोर्डाच्या वतीने बारावी परिक्षेप्रमाणे दहावी परीक्षेच्या निकाल देखील लवकर लावण्यात येईल. अद्यापही राज्यमंडळाने दहावी निकालाची कुठल्याही प्रकारची तारीख जाहीर केलेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. असे बोर्डाच्या सचिव सुगता पुन्ने यांनी सांगितले. राज्यमंडळाकडून अधिकृतपणे दहावी निकालाची तारीख जाहीर केली जाईल. असेही त्यांनी स्पष्ट केले.